रत्नागिरी : रत्नागिरीतील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरामध्ये २५ जानेवारी २०१९ रोजी रंगावली स्पर्धा आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्या विशाखा भिडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी मुख्याध्यापक विनोद नारकर, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कदम यांच्यासह सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पाणी वाचवा, झाडे लावा, बेटी बचाव, बेटी पढाव, प्रदूषण टाळा असे सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढल्या होत्या. गणपती, पाने, फुले, नक्षीही रांगोळीच्या माध्यमातून काढण्यात आली होती. एकूण ७७ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता.
श्रीशा रसाळ, रोहिणी कांबळे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. देवयानी वैद्य, राज साळुंके, अथर्व गुरव यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. पृथा फाटक, आर्यन साळुंके, श्रुती सनगरे, नीरजा कडवेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विद्यार्थी, पालकांनी प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
(प्रदर्शनातील विविध रांगोळ्या पाहा सोबतच्या स्लाइड-शोमध्ये...)